
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील, ग्रामपंचायत सुनगांव अंतर्गत वार्ड नंबर तीन मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लेंडी नाल्यावर ग्रामपंचायत सूनगांव, यांनी मागील वर्षी पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार केले नव्हते. त्या बाबतीत सुनगांव येथील विजय वंडाळे व गजानन मारोती धुळे यांनी, पंचायत समिती कार्यालय, जळगांव जामोद येथे तक्रार करून नंतर उपोषणास बसल्या नंतर, गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला आदेश दिल्यानंतरही, अंदाजपत्रकानुसार हे पुलाचे काम झाले नाही. पुलाची रुंदी ही 24 फूट असताना केवळ 13 फूट करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मागच्या वर्षी लेंडी नाल्याला पूर येऊन, हे पाणी पूर्ण परिसरात साचल्यामुळे, व नागरिकांच्या घरात घुसल्याने, नागरिकांच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू भिजल्या होत्या.


पुन्हा यावर्षी सदर पूल हा ग्रामपंचायतीने त्याची रुंदी वाढवत, त्यामध्ये दोन पाईप टाकले होते व सदर काम हे पुन्हा निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे सदर पूल हा पहिल्याच पावसात खचला आहे. या वर्षी सुद्धा काल 15 जून रोजी झालेल्या पावसामुळे परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले व खाण्यापिण्याच्या वस्तू भिजल्या व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या परिसरात घरामध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे, घरातील असलेल्या वस्तू ह्या निकामी झालेल्या आहेत. त्यामुळे या पुलाबद्दल ग्रामपंचायत सूनगांव यांनी योग्य तो निर्णय घेवून, परिसरातील पाण्याची विल्हेवाट लावावी असा तीव्र संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.



