
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील सूनगांव येथे, वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने, महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज खंडित होण्याबाबत पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
वीज खंडित होणे ही दिवसातून एखाद्या वेळेची बाब नसून, कधी-कधी दिवसातून दोन ते तीन वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार झाले आहेत. पण कधी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष देतील का? की त्यांना जनतेची पर्वाच नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. वीज विभाग बिल वसुलीत कोणतीही कसर सोडत नाही, तर सेवा देण्यात एवढा उदासीन का? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पावसाळा सुरू असतांनाही तालुक्यात कमालीची उकाडा जाणवत असून थोडा पाऊस आला म्हणजे वीज गेलीच समजा, रात्रभर लाईट बंद राहते या उन्हामुळे लहान मुले, वयोवृद्ध, तरुण असे सर्वच त्रस्त झाले आहेत. महावितरण च्या निष्काळजीपणातुन होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत, असेही नागरिकांकडून बोलले जात आहे. याकडे महावितरण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*वीज बिल वसुली करतात, पण सेवा देण्यात अपयश*
एकीकडे विजेचे दर दिवसेंदिवस वाढत असून वीज विभाग बिल वसुलीत कोणतीही कसर सोडत नाही, मग नागरिकांना सुविधा देण्याबाबत उदासीनता का? असा सवालही नागरिक करत आहेत.
नागरिकांनी वीज विभागाच्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला फोनद्वारे वीज खंडित होण्याचे कारण विचारले तर त्यांना नेहमीप्रमाणे एकच उत्तर मिळते की बिघाड झाला आहे. जर सारखा वीजपुरवठा खंडित होत असेल व विभागाचे त्याकडे लक्ष नसेल, त्यात विजेचा काय दोष असा सवालही नागरिक करत आहेत.



